होळीत आपल्यातील दोष जाळावा तुकोबाच्या वाणीतून होळी

          *सारस न्यूज एक्सप्रेस* 
मी होळीत काय आणि का जाळलं ?
याविषयी तुकोबाराय सांगतात,
दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं ।
दहन हे होळी होती दोष ॥
लोकं होळीत शेणाच्या गौऱ्या, लाकडं जळतात. 
"मी होळीत माझ्यातले 'दोष' जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही."
दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही.
सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी ।
कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥
"दुख्ख तर जवळ येतंच नाही, उलट सुख माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही."
सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे.

आमुची आवडी संतसमागम |
आणीक तें नाम विठोबाचें ॥
मला सुखाची अपेक्षा का नाही ? तर,
"संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे."

आमचें मागणें मागों त्याची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड ?  ॥
"मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार.  फक्त 'संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव' एवढंच मागेल. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील ?"

तुका म्हणे पोटीं सांठविला देव |
न्यून तो भाव कोण आम्हां ? ॥
"मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं,  मला आता कशाची कमतरता?"
सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.

💐 आपल्यातील दोष जळावेत म्हणून मनापासून  शुभेच्छा🦚💐🙏🙏

                                      भरत घासले